कातर वेळ
संध्याकाळी मी प्रवास करत नाही , कारण संध्याकाळी मी माझा राहत नाही. आठवणींचा कल्लोळ माजतो मनात आणि मन गुंतत जाते भूतकाळात. अनेक प्रसंग , अनेक माणसे डोकावून जातात , कधी मनाला दुखावून तर कधी सुखावून जातात . मन वेडे शोधत असते जुने सुखाचे क्षण , पण का राहून राहून आठवतात ते कठोर यातना दायी क्षण. गाडी जशी घेते वेग तश्या ह्या आठवणी पण जोराने उचंबळून येतात , किती सावरता सावरल्या तरी मनाला हरवून जातात. मनाला सावरणे हे केवळ निमित्त असते , खरे म्हणजे स्वतःला न दुखावू देण्याचा एक अट्टाहास असतो. तरी मन बावरे काही माझे ऎकत नाही , किती सावरता सावरले तरी पुन्हा येते आठवणींवरी. काही सुंदर आठवणी मनाला हरखून टाकतात आणि पुन्हा पुन्हा फिरून मनावर घिरट्या मारतात. संध्याकाळच्या कातर वेळीचा प्रवास हा एक अजब अनुभूती असते , ती घ्यावी का ना घ्यावी हीच मोठी पंचाईत असते. © जितेंद्र मनोहर शिंदे