व्हेंटिलेटर
नुकताच व्हेंटिलेटर सिनेमा बघायचा योग आला. एक सुंदर आणि नात्यांचा गोतावळा मांडणारा खूपच बोलका चित्रपट. कोकाणतल्या रत्नागिरी मधल्या कामेरकर कुटुंबातील एक व्रूद्ध व्हेंटिलेटर वर असतो आणि त्याच्या ह्या आजारपणात त्याच्या नातेवाईकांमधला भावनिक ओलावा, कडूपणा, जुने संघर्ष, वाटणी संबंधित राहिलेले मुद्दे हळूहळू बाहेर येतात.
कोकणातील माणसे साधी भोळी, ऐकमेकांवर जिवापाड प्रेम करणारी, नात्यात ओलेपणा जपणारी. पण वाद हा कोकणाच्या पाचवीला पुजलेला. कोकणी माणूस भलेही आपापसात भांडतो पण त्याच्यातील प्रेमाचा धागा अश्या नाजूक प्रसंगी अजून मजबूत होतो.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच नाती हळूहळू व्हेंटिलेटर वर येत आहेत. कोणालाच एकामेकासाठी वेळ नाही. घरात एकत्र कुटुंबे खूप कमी उरली आहेत आणि त्या एकत्र कुटुंबात पण मुलांना आपल्या आईवडिलांसाठी वेळ नाही. एकाच घरात राहून मुलांचा आईवडिलांच्या बरोबर प्रेमळ संवाद होत नसतो. आई वडील म्हणजे घरातील अडगळीची वस्तू बनत चालले आहेत. तरुण मुले आई बाबांना Outdated समजून त्यांना सर्व गोष्टींपासून दूरच ठेवणे पसंद करतात. नानाच्या 'आपला माणूस' चित्रपटातील डाइलॉग "शेवटचं कधी शिवला होतास रे म्हाताऱ्याला" अगदी चपखल बसतो अनेक कुटुंबांना.
आइबाबानी जिवाचे रान करून मुलांना लहानाचे मोठे केलेले असते आणि मोठे करताना त्यांच्या हातून अनेक गोष्टी घडत असतात ज्या लहानपणी मनावर खोल बिंबतात पण त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आयुष्य कमी पडते. आपल्या पौगुंडा अवस्थेत, तरुणपणी आई वडिलांनी घेतलेले निर्णय आपल्याला चुकीचे आणि आपल्यावर थोपलेले वाटतात पण त्याच्या मागे त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो, त्याच्या मध्ये असते निव्वळ प्रेम, पण ते प्रेम समजायला कदाचित आपल्याला स्वतः आईबाप होई पर्यंत वाट पहावी लागते.
जर आईबाबा आणि मुलांमधील नाती व्हेंटिलेटर वर आली असतील तर बाकीच्या नात्यांबद्दल काय बोलावे. काका, मामा, आत्या, मावशी, चुलतभाऊ, आत्येभाऊ ह्या नात्यांना तर आपण आजकाल फक्त सणासुदीला किंवा लग्न सभारंभात बघतो आणि ते पण आपण वेळात वेळ काढून गेलो तरच. आपल्या चुलत भावांच्या मुलांची नावे, त्यांची वये आपल्याला माहित नसतात. आपली मुले व त्यांची मुले वर्षानुवर्षे भेटलेली नसतात, तर मग हा नात्यांचा गोतावळा कसा टिकणार. गणपती, शिमगा हे सण सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी बनले आहेत पण आपण खूप कमीजण ह्या सणासुदीला एकत्र येतो आणि एकत्र आलोतरी सगळे जण मनमुराद पणे ऐकमेकांना भेटतील, आपली सुख दुःखें वाटतील ह्याचा भरवसा नाही. आज जोतो आपल्याच दुनियेत मशगूल आहे, प्रत्येकाला आपल्या मोठेपणाचा अभिमान आहे आणि तोच मोठेपणा तो मिरवत असतो.
खरंच आपण सर्वांनी ह्या गोष्टीचा विचार करून निदान सणासुदीला एकत्र यायला पाहिजे, आपल्यातील हेवेदावे विसरून नवीन पिढीला नात्यांच्या दोऱ्यात गुंफणे खूप गरजेचे आहे.
© जितेंद्र मनोहर शिंदे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा